रविवार, २९ मार्च, २०२६

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '... मलकापूरच्या ज्योती देशमुख ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी..

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '...
     मलकापूरच्या ज्योती देशमुख ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी..
     
मलकापूर -
 श्री मळाई ग्रुप आयोजित व शिवाजी आप्पा सराफ पुरस्कृत भव्य महिला मेळावा शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी दुपारी २. ३० वाजता आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. त्याला वरूण राजाचीही साथ लाभली.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. शक्तीचा जागर जिथे, तिथे सृष्टीही नतमस्तक होते असे काही चित्र मलकापूर कराडच्या पावन भूमीत पावसानेही या महिला मेळाव्याचे स्वागत केले.
        या महिला मेळाव्यासाठी मा.श्री अशोकराव थोरात, मा.श्री. प्रवीण जगताप, मा.सौ. शालिनीताई थोरात, मा. सौ. रोहिणी जगताप, मा.सौ.अरुणादेवी पाटील, मा.सौ स्वाती थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सामाजिक,राजकीय शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० सन्माननीय महिलांचा गौरव करण्यात आला..त्याचबरोबर २५० कष्टकरी महिलांना साडी देऊन सन्मानीत करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांनी केले. यावेळी महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिलांच्या कार्यकर्तुत्वांचा सन्मान नेहमीच श्री मळाई महिला विकास मंच करील असा आशावाद व्यक्त करीत महिलांनो स्वतःची ओळख जपा आपण कुणाची तरी मुलगी, पत्नी किंवा आई आहोतच, पण त्याआधी आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत. आपले छंद आणि आपली स्वप्ने कधीही मरू देऊ नका असा आपुलकीचा संदेश  त्यांनी दिला.
        यासोबतच मा.प्रा.दिपक तडाके संचलित होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित कार्यकम,रंगतदार खेळ, गाणी,नृत्य व हास्यविनोदाने नटलेल्या या मेळाव्यात आकर्षक बक्षिसांची लयलूटही करण्यात आली.
      होम मिनिस्टर या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सेमी पैठणी व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक साडी व ४ ते २० क्रमांकासाठी आकर्षक लेदर हँड बॅग्ज देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
      तसेच स्पॉट गेमसाठी १५ आकर्षक बक्षिसे व लकी ड्रॉ मधून आकर्षक  बक्षीस दिली गेली याशिवाय मेळाव्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेस शिवाजी आप्पा सराफ यांच्याकडून भेटवस्तू व चांदीच्या खरेदीवर ५०० रुपये  कॅशबॅक कूपन दिले गेले त्या कुपनची मुदत अधिक -जेष्ठ महिना संपेपर्यंत असेल शिवाजी आप्पा सराफ च्या वतीने सांगण्यात आले.
     स्त्री शक्तीचा गौरव,आनंदाचा जल्लोष, होम मिनिस्टरचा खेळ व  बक्षिसांची लयलूट  असणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थिती लावली.यावेळी स्त्री ही घराचा कणा असते, पण आज तिने सिद्ध केले आहे की ती समाजाचाही मुख्य आधारस्तंभ आहे. जिजाऊंच्या संस्कारांतून आणि सावित्रीच्या कष्टांतून मिळालेला वारसा आपण पुढे नेत आहोत. आजची स्त्री चूल आणि मूल सांभाळून आकाशाला गवसणी घालत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे  याचे सर्व श्रेय श्री मळाई ग्रुप व श्री मळाई महिला विकास मंच यांच्या  महिला सक्षमीकरणासाठी  केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना जाते असे  सहभागी स्पर्धेकांच्या वतीने  व्यक्त करण्यात आले.
 स्पर्धेतील विविध खेळ व त्यांचे विजेते

 1) होम मिनिस्टर 
  मानाची पैठणी  विजेत्या स्पर्धक- सौ.ज्योती देशमुख प्रथम क्रमांक (मलकापूर )
 होम मिनिस्टर सेमी पैठणी -द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धक- सौ.स्मिता शिंदे (मलकापूर) 
 होम मिनिस्टर आकर्षक साडी तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धक -निलोफर मुजावर( मलकापूर )
 होम मिनिस्टर स्पर्धेतील सहभागी स्पर्धक व  लेदर हॅन्डबॅगचे विजेते 
सौ.प्रतीक्षा विशाल पवार,सौ.सुलताना रफिक सुतार,कु.प्रणिता कांबळे,सौ.अश्विनी लावंड,सौ.ज्योती कदम,सौ. सायली खरमाटे,सौ. मनीषा चव्हाण,सौ. प्रियांका कदम,सौ. लक्ष्मी कटकदौंड,सौ. शालन पाटील 
2) लकी ड्रॉ प्रथम क्रमांकाच्या विजेत्या- सौ. राजश्री रोहित मगदूम
लकी ड्रॉ द्वितीय क्रमांक -सौ.सायराबानू अकबर नदाफ
 लकी ड्रॉ तृतीय क्रमांक  -सौ.सुमन आनंदा दरागडे  

लकी ड्रॉ विजेत्या इतर विजेते स्पर्धक
सौ. रेखा रामचंद्र सावंत,सौ. सुजाता राजेंद्र भावके,सौ.मनीषा सुरज चव्हाण,सौ हेमा रामदास भोसले,शबिना रफिक शेख.

सोमवार, २ मार्च, २०२६

आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे 'कचऱ्याची होळी'; स्वच्छतेचा संदेश देत सण उत्साहात साजरा..
कराड (प्रतिनिधी):
येथील आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. परंपरेला आधुनिकतेची जोड देत, विद्यार्थ्यांनी परिसरात गोळा केलेल्या कचऱ्याची होळी करून स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला.
या स्तुत्य उपक्रमाचे व मुलांच्या कल्पकतेचे संस्थेचे सचिव मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी विशेष कौतुक केले आहे. विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या होळीचे पूजन मुख्याध्यापक श्री. सचिन शिंदे सर यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटकेपणाने करण्यात आले होते.
याप्रसंगी सौ. अश्विनी पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना होळी सणाचे महत्त्व आणि त्यामागची पौराणिक कथा सांगितली. तसेच, सौ. प्राजक्ता पाटील यांनी या विशेष होळीची पूर्वतयारी आणि मांडणी अतिशय कल्पकतेने केली होती.
मुलांनी स्वतःहून कचरा गोळा करून त्याचे दहन केल्यामुळे 'स्वच्छ भारत' अभियानाला शाळेने आपला खारीचा वाटा उचलला आहे. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांमधून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
       
             श्री रफिक सुतार सर 
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर 

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation)
🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब:
इ.५ वी व ८ वी परीक्षा: फेब्रुवारी २०२६ च्या २ऱ्या किंवा ३ऱ्या रविवारी
इ.४ थी व ७ वी परीक्षा: एप्रिल किंवा मे २०२६ मधील कोणताही रविवार
📅 २०२६-२७ पासून नियमित परीक्षा:
दरवर्षी फेब्रुवारीच्या २ऱ्या/३ऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल.
📍 आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
💰 3. वाढलेली शिष्यवृत्ती रक्कम आणि कालावधी (Increased Scholarship Amount & Duration)
💸 रक्कम:
इ.४ थी स्तर: ₹500/महिना (₹5000/वर्ष)
इ.७ वी स्तर: ₹750/महिना (₹7500/वर्ष)
कालावधी: ३ वर्षे
🏦 वितरण: विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यातून थेट जमा.
📊 मंजूर संच संख्या:
इ.४ थी / ५ वी: १६,६९३
इ.७ वी / ८ वी: १६,५८८
🧾 4. पात्रता निकष (Eligibility Criteria)
✅ निवास: महाराष्ट्रातील रहिवासी
✅ शिक्षण: शासनमान्य शाळेत इ.४ थी किंवा ७ वी शिकत असलेला विद्यार्थी
वयमर्यादा (१ जून रोजी):
इ.४ थी: १० वर्षे (दिव्यांग: १४ वर्षे)
इ.७ वी: १३ वर्षे (दिव्यांग: १७ वर्षे)
किमान गुण: प्रत्येक पेपरमध्ये ४०% गुण आवश्यक.

📚 5. परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम (Exam Format & Syllabus)
🗒️ माध्यमे: मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू
📖 अभ्यासक्रम:
इ.४ थी स्तर – इ.१ ली ते ४ थी
इ.७ वी स्तर – इ.१ ली ते ७ वी
🧠 प्रश्न स्वरूप: वस्तुनिष्ठ (MCQ), ४ पर्यायांपैकी १ योग्य
🎯 काठिण्य पातळी: कठीण (३०%), मध्यम (४०%), सोपे (३०%)
✏️ पेपर रचना:
पेपर १: प्रथम भाषा (५० गुण) + गणित (१०० गुण)
पेपर २: तृतीय भाषा (५० गुण) + बुद्धिमत्ता चाचणी (१०० गुण)

 संकलन - श्री रफिक सुतार सर 
 आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर 

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर च्या वेबसाईट चे उदघाटन

*आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगरच्या शाळा वेबसाईटचे उद्घाटन उत्साहात संपन्न* 
*डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली -डॉ.सौ.स्वाती थोरात* 
   श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहार आगाशिवनगर च्या शाळा वेबसाईट चे उद्घाटन संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ. स्वाती थोरात यांच्या शुभहस्ते ,पालक प्रतिनिधी.श्री श्रीकांत नरूले, श्री अतुल काकडे ,श्री.तानाजी शिंदे,श्री.निखिल केसकर,श्री विजय हजारे ,श्री संदीप गायकवाड ,श्री.सचिन मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक- सचिन शिंदे ,श्रीमती लता नलवडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.
      सध्याच्या संगणकयुगात शैक्षणिक प्रगती व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीसाठी डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली आहे .असे मत संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ.स्वाती थोरात मॅडम यांनी व्यक्त केले.
       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे ,आनंददायी शिक्षणाचे आदर्श संस्कार मंदिर अशी ख्याती असणारे आदर्श ज्ञानसंकुलन आता एका क्लिक वरती उपलब्ध होत असून संस्थेचे सचिव- मा.अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली संधी. ही नक्कीच नवनवीन शैक्षणिक क्षितिजे पादाक्रांत करण्यास सहाय्यभूत ठरेल. असा विश्वास विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री सचिन शिंदे यांनी व्यक्त केला.
       यावेळी सौ.अर्पिता बाबर सौ.स्वप्नाली भिलारे, सौ.शुभांगी तोडकर,सौ.साक्षी मोरे,सौ. दिपाली तांबे, सौ. ऐश्वर्या शेवाळे सौ.विशाखा पवार ,सौ.दिपाली खबाले, सौ.रविना कुंभार ,सौ. स्वाती हावळ,सौ.रुपाली चौगुले,सौ जोत्स्ना जगदाळे, सौ.प्रियांका देशमुख,सौ.सविता भाष्टे, सौ.अनिता कुंभार आधी पालक व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोपान जगताप यांनी केले.तर आभार श्री.रफिक सुतार यांनी मानले.

@आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा@

*@ १५ ऑक्टोबर @*
*वाचन प्रेरणा दिन*

१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत. पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते. वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे. वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात. एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य. नुसता एकच दिवस 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करुन थांबण्यापेक्षा, रोजच जर पुढील उपक्रमांद्वारे वाचन प्रेरणा राबविली तर वाचन प्रेरणा दिनाचे रुपांतरण वाचन चळवळीत होईल, यांत शंका नाही. या साठी केवळ शाळेतच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, घर परिसर, घर या पातळ्यांवर वाचनालय, पुस्तक पेढी, पुस्तक भेट योजना, पुस्तक दान योजना, वाचन प्रेरणा विषयक व्याख्याने यांचे वेळोवेळी वा कायमचे आयोजन/नियोजन आवश्यक आहे. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी. आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्र मैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

*वाचाल तरच वाचाल*
'वाचाल तर वाचाल' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !
प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, संवेदनशील, रसिक व कलावंत होण्यासाठी प्रत्येक शाळेने वाचन प्रेरणेचे कार्यक्रम घेऊन येणारी पिढी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची घडवावी हेच 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करतांना अपेक्षित आहे. पुस्तकी वाचनासोबत आपण एखाद्याच्या 'मनाचे' ही वाचन करावे ही सर्वांना नम्र विनंती करुन, आम्ही आपला निरोप घेतो.

संकलन :- श्री रफिक सुतार 
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

श्री मळाई महिला विकास मंच आयोजित, - महिला मेळावा उत्साहात साजरा.

५५वा महिला मेळावा मलकापूर येथे  महिलांच्या उस्फुर्त सहभागाने संपन्न.
     मलकापूर मध्ये अवतरल्या  गौराई..
मलकापूर-
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांचे संयुक्त विदयमाने मलकापूर, आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी घेण्यात आलेला महिला मेळावा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात व महिलांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडला. प्रमुख पाहुण्या  हेल्दी  मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख योगशिक्षिका मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ,  कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या मा. श्रीमती अपर्णा यादव, मा. सौ.शालिनीताई थोरात (काकी), श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाइस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्याक्षा डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.
         कार्यक्रमाच्या पाहुण्या मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
       प्रास्ताविकपर भाषणात श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी महिला मेळावा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करीत मळाई महिला विकास मंच नेहमीच महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलाच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारच तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.सुखाचे सण म्हणजेच मंगळागौर होय. या संस्कृतीचे आपणांस जतन करायचे आहे. यावेळी पिंगळ्याच्या गाण्यातून विरोधाभास वाटत असला तरी त्यामधून नात्यांची  जपणूक कशी करावी हे सांगितले आहे असे मत व्यक्त केले.
     यावेळी हेल्दी मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षिका महिला पालक यांनी वेगवेगळे गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून कार्यक्रमांमध्ये बहार आणली. यामध्ये गणेश वंदनापासून ते गौरी गणपतीच्या विविध  गाण्यांवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी मळा ई महिला विकास मंचच्या वतीने सहभागी महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
           या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाळेतील शिक्षिका, महिला पालक वर्ग यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन या महिला मिळवणारे खऱ्या अर्थाने  कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे या निमित्ताने अधोरेखित केले. तसेच महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही प्रकारचे सीमा नसते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे  घराला घरपण देणारी महिला अर्थात गृहिणी ते आपले आवडते छंद तितक्याच ताकदीने जोपसणारी कलारसिक, कलाउपासक असा तिचा कल  असेच काही चित्र या महिला मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.शीला पाटील,  प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार माजी व्हाईस चेअरमन मा.सौ अरुणादेवी पाटील यांनी मानले. 
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व सदस्या, सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त  कलागुणांना वाव देण्यासाठी श्री
 मळाई महिला विकास मंचने आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याचे महिला पालक वर्गामध्ये विशेष कौतुक होत आहे..

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

आदर्श ज्ञानसंकुलात 'विद्यार्थी शिक्षक दिन साजरा..





*आदर्श ज्ञानसंकुलनात‌ शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी -पालक स्वयंशासन दिन उत्साहात साजरा* 
     गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानाविना ना जगी सन्मान या उक्तीप्रत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शिक्षकांची महती प्रत्यक्ष अनुभवता यावी.अध्ययन- अध्यापन,शालेय प्रशासन यांविषयी अनुभव घेता यावा यासाठी ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनी आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहार आगाशिवनगरमध्ये विद्यार्थी- पालक स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले.
     शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षक हेच सक्षम व संस्कारक्षम नवभारताचे भाग्यविधाते आहेत.आजच्या विद्यार्थी केंद्रितअध्ययन-अध्यापन शास्त्रातील सर्व बारकावे विद्यार्थ्यांना जवळून पाहता यावेत.यासाठी विद्यालयात आयोजित केलेल्या स्वयंशासन दिनामध्येअभिरूप मुख्याध्यापक -अनय बोधे ,अभिरूप उपमुख्याध्यापिका- अनघा काकडे ,लेखनिक -गौरव शेलार ,कु.समीक्षा मोहने,परिचर म्हणून - इंद्रजित भिसे ,आरव कांबळे ,राजवीर घोरपडे यांनी संपूर्ण दिवस शालेय प्रशासन शिस्तबद्धरीत्या चालवले.अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून विविध घटकांचे अध्यापन करून कला ,क्रीडा, साहित्य ,खेळ,प्रयोग प्रात्यक्षिकांच्या तासिका घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. 
        दुपार सत्रामध्ये ,स्वयंशासन दिनाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सौ सविता भाष्टे,सौ उर्मिला साबळे ,सौ लक्ष्मी कणसे सौ स्नेहल घारे सौ. कोमल पाटील ,सौ अनिता कुंभार,सौ वैशाली जाधव,सौ.आरती देशमुख, सौ. विद्याश्री शेतमंदी,सौ. स्नेहल घारे ,श्री.दिगंबर सुतार ,श्री.श्रीकांत नरूले,श्री.तानाजी शिंदे,श्री.महेश मगरे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक-श्री. सचिन शिंदे, आदर्श शिशु विहारच्या मुख्याध्यापिका श्रीमती-लता नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतरअभिरूप शिक्षक-शिक्षिका,अभिरूप मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.यावेळी मा.रफिक सुतार ,मा. वैभव शिर्के ,मा.सोपान जगताप ,सौ.रुपाली कुंभार, सौ.प्राजक्ता पाटील ,सौ.अश्विनी पाटील,सौ.रंजना कांबळे,सौ.नंदा पानवळ, सौ.शबाना मुल्ला, सौ.सायराबानू नदाफ ,सौ.वनिता कुंभार ,कु.आकांक्षा झुमूर ,सौ.शितल भिसे,सौ.मेघा भाटे ,सौ.शोभा मोरे ,सौ.दिपाली रेठरेकर सौ.वैशाली शिंदे, श्री.संग्राम काकडे यांचेसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अनघा काकडे हिने केले तर गौरव शेलार याने आभार मानले. अशाप्रकारे स्वयंशासन दिनमोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
     संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात (भाऊ) .अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील ,उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील ,खनिजदार- मा.तुळशीराम शिर्के ,संचालिका डॉ. स्वाती थोरात व संचालक-मा.वसंतराव चव्हाण यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '... मलकापूरच्या ज्योती देशमुख ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी..

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '...      मलकापूरच्...